ताज्या घडामोडी

गौतम बुद्धांची शिकवण आणि प्रेरक विचार प्रत्येकाने आत्मसात करून समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न करावेत – मंत्री छगन भुजबळ* *दिमाखदार बौद्ध भिक्‍खु विपश्‍यना केंद्र लोकार्पण सोहळा संपन्न*

*गौतम बुद्धांची शिकवण आणि प्रेरक विचार प्रत्येकाने आत्मसात करून समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न करावेत – मंत्री छगन भुजबळ*

*दिमाखदार बौद्ध भिक्‍खु विपश्‍यना केंद्र लोकार्पण सोहळा संपन्न*

*नाशिक, येवला, दि. ३ मार्च:- भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला आहे. गौतम बुद्धांची शिकवण आणि प्रेरक विचार पुत्येकाने आत्मसात करून समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज येवला येथील मुक्तीभूमीवरील १५ कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या दिमाखदार बौद्ध भिक्खु विपश्यना केंद्र व विविध विकास कामांचे लोकार्पण भिक्खू वाटसनपॉन्ग मेडिटेशन सेंटरचे संचालक फ्रा ख्रुसुतमतावाचाई मठी आणि बुद्ध इंटरनॅशनल वेलफेअर मिशन तसेच इंटरनॅशनल बुद्धीस्ट मॉक ट्रेनिंग स्कूलचे संस्थापक सचिव भिक्खू बी.आर्यपल व मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी भिक्खू सुगत थेरो, भिक्खू संघरत्न, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता,विलास पाटील, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर, प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मायावती पगारे, येवला बाजार समितीचे सभापती किसनकाका धनगे, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, बंडू क्षीरसागर, माजी नगराध्यक्षा राजश्री पहिलवान, हुसेन शेख,बंडू क्षिरसागर,राजेंद्र लोणारी, शहराध्यक्ष दिपक लोणारी, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, भागिनाथ पगारे, संतोष खैरनार,सुभाष गांगुर्डे,यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, १३ ऑक्टोबर १३ ऑक्टोबर १९३५ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्यातील याच ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली. त्यावेळी सुमारे १० हजार लोक येथे धर्मांतर घोषणेवेळी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकालातील तीन भूमी महत्वाच्या आहेत. जेथे धर्मांतराची घोषणा केली ती मुक्तीभूमी, जेथे बौद्ध धर्माची दिक्षा घेतली ती नागपूरची दिक्षाभूमी व जेथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले ती चैत्यभूमी आहे. करूणा, सत्य व अहिंसा या तत्वावर आधारित बौद्ध धर्माचा स्वीकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारला. बौद्ध धर्माचा इतिहास पाहता सम्राट अशोकाने या धर्माचा प्रचार केला. आपल्या मुलांनाही बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी श्रीलंकेत पाठविले. बुद्धगया येथील महाबोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण त्यावेळी सम्राट अशोकाच्या मुलीने श्रीलंकेत केले आहे. त्याच बोधीवृक्षांच्या फांदीचे रोपण नाशिक येथील त्रिरश्मी लेणी येथे करण्यात आले आहे.

मंत्री श्री. भुजबळ पुढे म्हणाले, आजचा दिवस हा खुप महत्वाचा व आनंदाचा आहे. या मुक्तीभूमीवर यापूर्वी पहिल्या टप्प्यात सुमारे १५ कोटी रुपये निधीतून याठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांची भव्य मूर्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, विश्वभूषण स्तूप व विपश्यना हॉल इ.निर्माण करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या स्थळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘ब’ वर्ग तिर्थ स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. मुक्तीभूमी टप्पा २ अंतर्गत सुमारे १५ कोटी रुपये निधी खर्च करून विविध विकास कामे करण्यात आली आहे. यामध्ये पाली व संस्कृत अभ्यास केंद्र, सुसज्ज ग्रंथालय, ऑडीओ व्हिज्युअल रूम, आर्ट गॅलरी, अॅम्पीथिएटर, मिटिंग हॉल, भिक्खू पाठशाला, १२ भिक्खू विपश्यना खोली, कर्मचारी निवासस्थान, डायनिंग हॉल, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते व लॅण्डस्केपिंग या कामांचा समावेश आहे. नागरिकांनी या वास्तूंचे संवर्धन करावे, येथे स्वच्छता राखावी तसेच केव्हाही येथे भेट देवून येथे असणाऱ्या बौद्ध भिक्खु यांच्याकडून विपश्यना संदर्भात ज्ञान प्राप्त करावे व ध्यान करावे जेणेकरून दैनंदिन जीवनातील ताणतणाव यापासून मानसिक शांती मिळण्यास मदत होईल असेही मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित धम्मबांधव व नागरिक यांना संबोधित केले.

यावेळी भिक्खू आर्यपाल म्हणाले की, *सम्राट अशोकाने गौतम बुद्धांचे विचार जगभरात पोहचविण्यासाठी ते रुजविण्यासाठी महत्वपूर्ण काम केलं. आज मंत्री छगन भुजबळ हे देखील सम्राट अशोका प्रमाणे बुद्धाचा शांतीचा मार्ग देशभरात पोहोचवित आहे*. वाईट विचार करू नका, वाईट काम करू नका व मन स्वच्छ ठेवा या बुद्धांच्या शिकवणीचा प्रत्येकाने अंगीकार करून प्रचार करावा असे भिक्खू आर्यपाल यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मंत्री छगन भुजबळ यांच्या समवेत भिक्खू वाटसनपॉन्ग मेडिटेशन सेंटरचे संचालक फ्रा ख्रुसुतमतावाचाई मठी आणि बुद्ध इंटरनॅशनल वेलफेअर मिशन तसेच इंटरनॅशनल बुद्धीस्ट मॉक ट्रेनिंग स्कूलचे संस्थापक सचिव भिक्खू बी.आर्यपल,भिक्खू सुगत, भिक्खू संघरत्न यांनी मुक्तीभूमी येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस अभिवादन करून बौद्ध वंदना घेतली. त्यांनतर मुक्तीभूमीच्या परिसराची पाहणी केली.

यांनतर १५ कोटी रुपये खर्च करुन उभारण्‍यात आलेल्‍या भव्‍यदिव्‍य, दिमाखदार बौद्ध भिक्‍खु विपश्‍यना केंद्र या इमारतीच्‍या लोकार्पण मंत्री छगन भुजबळ यांनी फित कापून केले. त्‍यानंतर इमारतीच्‍या आतील कार्यालयाची पहाणी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (पूर्व) विलास पाटील यांनी केले तर आभार शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भिक्खू सुगत थेरो यांनी मानले.

यावेळी लोकशाहीर शितल साठे व सचिन माळी यांनी भगवान गौतम बुध्द व भीम गीतांचे सादरीकरण केले.
०००००००

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!