ताज्या घडामोडी

श्रमजीवी मुख्यालयात हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या स्मारकाचे अनावरण

सुहास पांचाळ / पालघर जिल्हा प्रतिनिधी

उसगाव / दि. २५.०९ : उसगाव येथील श्रमजीवी संघटनेच्या मुख्यालयाच्या आवारात चिरनेर जंगल सत्याग्रहात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिसूर्य हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, सामाजिक कार्यकर्ते व नायरा संस्थेचे अध्यक्ष रोहन गायकवाड यांच्या उपस्थितीत कातकरी मुलांच्या विक्रीचे आणि वेठबिगारीचे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या गोकुळ हीलम आणि सुनील वाघ या कातकरी तरुणांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच यावेळी आदिम (कातकरी) प्रतिनिधी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी श्रमजीवी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वसई तालुक्यातील उसगाव डोंगरी येथील साने गुरुजी प्रशिक्षण संकुल या श्रमजीवी संघटनेच्या मुख्यालयात आज हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या स्मृती दिनी या थोर स्वातंत्र्यवीराच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या पुतळा अनावरणाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन कातकरी तरुणांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. श्रमजीवी संघटनेचे इगतपुरी तालुका अध्यक्ष गोकुळ हीलम आणि तालुका सचिव सुनील वाघ या कातकरी तरुणांसह नाशिक जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील कातकरी पाड्यांवरील कोवळ्या मुलांची एक मेंढी आणि ५०० ते १००० – २००० रुपये देऊन मेंढपालांनी खरेदी केल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आणले होते. या प्रकरणी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक, तथा, राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष श्री विवेक भाऊ पंडित यांचे मार्गदर्शन आणि पाठपुराव्यामुळे या बाल वेठबिगारीच्या पाशात नशिकच नव्हे तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी कातकरी मुले अडकल्याचे समोर आले आहे. जव्हार, भिवंडी येथील कातकरी मुलांना देखील अहमदनगर येथील मेंढपालांकडे कोवळ्या मुलांना राबवले जात असल्याचे वास्तव शासनाच्या निदर्शनास आणून देत सरकारचे लक्ष वेधले.

१९३० साली चिरनेर जंगल सत्याग्रहात हुतात्मा नाग्या कातकरी यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. आज या ऐतिहासिक बलिदानाला 92 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने आज श्रमजीवी मुख्यालयात आदिम कातकरी समाजाची दशा आणि दिशा या विषयावर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी मार्गदर्शन केले. यावेळी “स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही कातकरी सामाज्याची मुलं अवघ्या ५०० -हजार रुपयांना विकण्याची वेळ येते. या कोवळ्या मुलांचे बालपण हिरावून घेऊन, त्यांना वेठबिगारी करावी लागते हे अत्यंत क्लेशदायक असून, कातकऱ्यांच्या या दयनीय अवस्थेला व्यवस्थेसह समाजाचा घटक म्हणून मी देखील जबाबदार आहे” असे मत विवेक पंडित यांनी व्यक्त केले.

हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या स्मृती दिनी आदिम (कातकरी) प्रतिनिधी संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष श्री. रामभाऊ वारणा, सामाजिक कार्यकर्ते व नायरा संस्थेचे अध्यक्ष श्री. रोहन गायकवाड यांच्यासह, उपाध्यक्ष लक्ष्मण सवर, संघटनेचे सचिव विजय जाधव, बाळाराम भोईर, पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड, ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे यांच्यासह, ठाणे कातकरी घटक प्रमुख जयेंद्र गावित, भिवंडी ता.विभागीय सचिव लक्ष्मी मुकणे, सामाजिक कार्यकर्ते, ॲडवोकेट रवी पवार. रवी भुरकुंड, रसिका फाटक नाशिक जिल्हा सचिव संजय शिंदे, जया पारधी ,प्रमोद पवार , संगीता भोमटे , गणेश उम्बरसडा समर्थनचे रुपेश कीर ,मनोज सातवीं, स्नेहा घरत , दीपक खंडागळे यांच्यासह श्रमजीवी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!