संविधान विरोधकांना पराभूत करण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल : ‘वंचित’ चे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण
संविधान विरोधकांना पराभूत करण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल : ‘वंचित’ चे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण
हातकणंगले, प्रतिनिधी. संतोष कोठावळे
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना आपला खरा शत्रू स्पष्टपणे ओळखता आला पाहिजे. दूरदृष्टी असणारे आणि मनुवाद्यांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहणारे बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते आहेत. शत्रूच्या कचाट्यात संविधान सापडले आहे. आपल्याला संविधान जर जिवंत ठेवायचे असेल तर संविधान समर्थकांच्या बाजूनेच आपल्याला उभे राहावे लागेल आणि संविधान विरोधकांना पराभूत करण्याची मोठी जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या आदिवासी व भटके विमुक्त समितीचे राज्य समन्वयक, पक्षाचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी कोल्हापूर येथे बोलताना व्यक्त केले.
ते वंचित बहुजन आघाडीच्या आदिवासी व भटक्या विमुक्त जाती समन्वय समितीच्या कोल्हापूर जिल्हास्तरीय मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा प्रभारी डॉ. क्रांती सावंत या होत्या.
प्रा. किसन चव्हाण पुढे म्हणाले, दलित, आदिवासी व भटक्या विमुक्त जाती – जमातीसह तमाम स्त्रियांना सर्वोच्च सन्मान देणारे संविधान विरुद्ध आर. एस. एस. असा सरळ सामना चालू असून सत्तेसाठी लढणारे विरुध्द मानवमुक्तीसाठी लढणारे यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. 2024 ची निवडणूक म्हणजे महायुद्ध असून यामध्ये आम्हीच विजेते होणार आहोत. यासाठी आदिवासी व भटक्या विमुक्त जाती समूहाने संघटित होवून रणशिंग फुंकावे. डॉ. अरुण जाधव म्हणाले, देशामध्ये जनावरे, पक्षांची संख्या सांगता येते पण भटक्या, विमुक्त, आदिवासी, ओबीसींची संख्या सांगता येत नाही हे दुर्दैवी आहे. हा समाज वंचित असून उघड्यावर आहे. सत्ता भोगणाऱ्यांच्यामुळेच या समाजाची प्रगती झालेली नाही. त्यामुळे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या दौऱ्याचे नियोजन केले आहे. प्रा. विष्णू जाधव म्हणाले, देशातील वंचित आणि बहुजन समाज आज बाळासाहेब आंबेडकरांच्या कडे आशेने पाहतो आहे. येणाऱ्या निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन आपली प्रगती साधायची आहे. डॉ. क्रांती सावंत यांनी अध्यक्षीय मनोगतात वंचितच्या कामाचा आढावा घेऊन आदिवासी, भटक्या आणि विमुक्त जातीसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक वंचितचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष (उ.) प्रा. विलास कांबळे यांनी केले तर स्वागत दयानंद कांबळे जिल्हाध्यक्ष ( द. ) यांनी केले तर आभार आय. टी. व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय सुतार यांनी मानले. यावेळी कंजार भाट समाजाचे जिल्हाध्यक्ष संतोष राठोड, शहराध्यक्ष महेंद्र तमायचीकर, कागल तालुका गोसावी समाजाचे अध्यक्ष रोहित गोसावी यांच्यासह अनेक समाज बांधवांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत प्रा. विष्णू जाधव व मान्यवरांनी केले.
यावेळी पक्ष निरीक्षक सागर कांबळे, कोल्हापूर शहराध्यक्ष मिलिंद पोवार, कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष मिलिंद सनदी, जिल्हा महासचिव महादेव कुंभार, शहर महासचिव मल्हार शिर्के, जिल्हा उपाध्यक्ष द. संतोष सुळकडे, जिल्हा सचिव विश्वास फरांडे, शहर उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे, उपाध्यक्ष अमित नागठीळे, प्रशांत कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश कांबळे, सहसचिव विजय कांबळे, युवा महासचिव दीपक कांबळे, कृष्णात कांबळे, करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी, शाहूवाडी तालुका अध्यक्ष आनंदा कांबळे, लक्ष्मण कांबळे, अविनाश बनगे, हातकणंगले तालुका अध्यक्ष आशपाक देसाई, हुपरी शहराध्यक्ष पांडुरंग मानकापूरे, शिरोळ तालुका उपाध्यक्ष मोहन मालगे, गजानन कांबळे, करवीर तालुका युवा आघाडी अध्यक्ष नितीन कांबळे, शिरोळ तालुका युवा आघाडी अध्यक्ष महेंद्र कांबळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.