औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं आनंद वाटला’; भुजबळांनी करुन दिली बाळासाहेबांची ती आठवण!
औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजी नगर तसेच उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली सांगीतली
नाशिक, 25 फेब्रुवारी : औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर तसेच उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून, यावेळी बोलताना त्यांनी भाजपला देखील जोरदार टोला लगावला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची गेल्या अनेक वर्षांपासून जी इच्छा होती ती आज पूर्ण झाली. ते वर्तमानपत्रातून औरंगाबादला संभाजीनगर म्हणायचे. महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात दोन्ही ठराव मंजूर झाले होते. आज बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ
आज बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद आहे, ते वर्तमानपत्रातून औरंगाबादला संभाजीनगरच म्हणायचे. महाविकास आघाडीने देखील नामंतराचा ठराव त्यावेळी मंजूर केला होता. जसा जसा शब्द कानावर पडेल तशी तशी छत्रपती संभाजीनगर म्हणायची सवय होईल, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी ए्मआएमकडून नामंतराला सुरू असलेल्या विरोधावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. एखादा विषय सगळ्यांनाच पटतो असं नाही, काही लोक त्याला विरोध करणारच. पण मला वाटतं आता हा विषय जवळ-जवळ संपलेला आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे