ताज्या घडामोडी

२२ नोव्हेंबर ❀ पहिल्या स्त्री डॉक्टर रखमाबाई राऊत जन्मदिन

❀ २२ नोव्हेंबर ❀
पहिल्या स्त्री डॉक्टर रखमाबाई राऊत जन्मदिन

जन्म – २२ नोव्हेंबर १८६४
(गोरेगाव,मुंबई)
स्मृती – २५ डिसेंबर १९५५
(मुंबई)

सुबोध सावंत -नवी मुंबई प्रतिनिधी

भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर रखमाबाई जनार्दन सावे उर्फ रखमाबाई राऊत.
रखमाबाई या हरिश्चंद्र यादवजी ह्या त्याकाळच्या ‘रायबहादूर’ आणि ‘जस्टिस ऑफ पीस’ अशी नेमणूक असलेल्या गृहस्थांची नात.
ते स्वत: उत्तम इंग्रजी शिकलेले आधुनिक विचारांचे गृहस्थ होते.

रखमाबाईंची आई, जयंतीबाई ही वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी विधवा झाल्या नंतर त्यांनी तिचा दुसरा विवाह करून दिला. रखमाबाई ही जयंतीबाई यांची पहिल्या विवाहापासूनची मुलगी. जयंतीबाईंचे दुसरे पती
डॉ. सखाराम राऊत हे नावाजलेले वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते.
तसेच ते शल्यचिकित्साही शिकवत.
त्याकाळी त्यांच्या ज्ञातीमध्ये विधवाविवाहाला विरोध नसला तरी बाल विधवा विवाह की प्रौढ विधवा विवाह,
हा प्रश्न चांगलाच जोर धरून होता.
हा विरोध पत्करून केलेलं सापत्यविधवे सोबतचं लग्न हे हरिश्चंद्रजी आणि डॉ. सखाराम दोघांचंही धाडसाचं पाऊल होतं.

रखमाबाईंच्या जडणघडणीत त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा मोठा वाटा तर आहेच,
परंतु त्याचा योग्य वापर करून आपलं व्यक्तिमत्व घडवणं,
हेही तितकंच महत्वाचं आहे.
त्या काळच्या रितीरिवाजाप्रमाणे वयाच्या नवव्या वर्षी लग्न झालं, तरी विसावं लागेपर्यंत त्यांच्या सासरी जाण्याचा प्रश्न उद्भवला नव्हता.
ही तेव्हा सामान्य बाब खचित नसावी.
कदाचित वयात आल्याआल्या त्यांना सासरी पाठवलं गेलं असतं तर सासरी जाणं हितावह की नाही हा विचार कितपत टोकदारपणे त्या करू शकल्या असत्या,
हा एक प्रश्नच आहे.
सासरी जाण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे प्रसिद्ध रखमाबाई विरुद्ध दादाजी खटला झाला. त्यांच्या आईनं मुलीसोबत सुनेलादेखील इंग्रजी शिक्षण दिलं होतं.

खटल्याच्या पूर्वकाळात शिक्षणासोबतच त्या आर्य समाजाच्या चिटणीसपदाचा कार्यभार सांभाळत.
हरिश्चंद्र यादवजी आणि
डॉ. सखाराम अर्जुन या दोघांची समाजातील प्रतिष्ठितांत तसेच इंग्रज लोकांत उठबस होती. आपली मतं स्पष्टपणे मांडल्यामुळे आणि कणखरपणामुळे रखमाबाईंनाही ह्या दोन्ही वर्तुळांत विशेष वागणूक मिळत असे.
स्वतः लेडी गव्हर्नर,
लेडी जस्टिस त्यांना चहा पार्टी साठी आमंत्रणं धाडीत.
त्यामुळे त्यांचे विचार आणि कहाणी इंग्रज समाजात थेट परिचयाची होती.

नव्या हिंदुस्थानाच्या तरूण पिढीची प्रतिनिधी म्हणून हा युरोपियन समाज त्यांच्याकडे कौतुकानं आणि आदरानं पाहत असे.
इतकेच नव्हे तर इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेल्यानंतर तिथेही रखमाबाईंना विचारवंत व अभ्यासू लोक भेटले.
ऍलिस
(बर्ट्रांड रसेलची प्रथम पत्नी),
हेन्रिएट्टा मुल्लर, पंडिता रमाबाई, इव्हा मॅक्लेरन अशी बरीच मंडळी त्यांच्या व्यक्तीसंग्रहात होती. इंग्लंड मध्ये सुद्धा त्या वेगवेगळ्या सभांमधून भाग घेत राहिल्या. ह्यावरून त्यांचा सतत कार्यरत राहण्याचा पिंड दिसून येतो.

त्या काळात परदेशातसुद्धा स्त्रियांचे वैद्यकीय शिक्षण तितकं सोपं नव्हतं.
असं असताना रखमाबाईंनी भूलतंत्र, सुईणपण, दंतशास्त्र ह्यांचा व स्त्रीरोग चिकित्सेचा विशेष अभ्यास केला.
त्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन खास शिक्षण घेतलं. बाळंतपणाचं शास्त्र व बाळंतपणातल्या शस्त्रक्रिया ह्या विषयांत
‘लंडन स्कूल ऑफ मेडिसिन’ इथल्या परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलं.
त्याच सोबत शरीराला मालिश करण्याचं तंत्र आणि त्याचा अनुभवही त्यांनी घेतला.

वैद्यकीय शिक्षणात स्त्री-पुरुष आपपरभाव न करणाऱ्या ह्या कॉलेजात
‘मुलींना पदवीदान करणे’,
हे मात्र विद्यापीठाच्या कायद्यात बसत नसे.
तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे रखमाबाईंनी ही शेवटची परीक्षा ‘Onjoint board of the colleges of physicians and surgeons of Edinburgh and Glasgow’ ह्या स्कॉटलंडच्या संस्थेत दिली आणि त्या उत्तम तर्हेनं उत्तीर्ण झाल्या.

‘Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons’
ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचं नांव इंग्लंडच्या
‘मेडिकल रजिस्टर’ मध्ये सनदशीर दाखल झालं. रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणार्या
‘डफरिन फंडा’ तर्फे एकूण सात रुग्णालये उघडण्यात आली. पहिलं दिल्लीत निघालं.
त्यानंतर मुंबईत कामा हॉस्पिटल, नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालयं चालू झाली.

रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली.
तिथे त्यांची नेमणूक
‘हाऊस सर्जन’ म्हणून झाली.
इथे त्यांनी केवळ सहाच महिने काम केलं.
कामा हॉस्पिटलमधल्या तात्पुरत्या नेमणुकीनंतर रखमाबाईंना सुरतच्या तेव्हाच्या
‘शेठ मोरारभाई व्रजभूषणदास माळवी हॉस्पिटल’ मध्ये
‘मेडिकल ऑफिसर’ ह्या पदावर नियुक्त करण्यात आलं. परदेशगमन, लग्नासंबंधीचा खटला अश्या सगळ्या वादग्रस्त परिस्थितीत सुरतेची ही नोकरी त्यांच्या पथ्यावरच पडली.

त्यांचा वैद्यकीय कार्यकाल हा मुख्यत्वे वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत सुरत तर त्यानंतर राजकोट इथे गेला.
दोन्ही ठिकाणी त्यांनी फक्त व्यवसाय हेच ध्येय न ठेवता सोबत समाजोपयोगी कामंही केली.
सुरतेत तर पायाभरणीपासून सुरुवात होती.
आधी तर बर्याचश्या स्त्रिया कुठल्याच दवाखान्यात प्रसूतीसाठी जायला तयार नसायच्या.
त्यात ह्यांच्या इस्पितळासाठी इमारत तयार होती
परंतु ती झपाटलेली असल्याच्या वदंता पसरल्या होत्या.
तेव्हा इमारतीत शेळीचं सुखरूप बाळंतपण करून खात्री देण्यापासून ते दवाखान्यात प्रसूतीसाठी न येणाऱ्या स्त्रियांचं समुपदेशन तर केलंच आणि त्यासाठी शेवट पर्यंत अथक प्रयत्न करत राहिल्या. उपचारांसाठी आलेल्या स्त्रियांसोबतच्या मुलांसाठी बालक मंदिर स्थापन केलं. समाजाकडून अव्हेरलेल्या विधवा व त्यांच्या मुलांचं त्या आश्रयस्थान बनल्या.
इतकंच नव्हे तर आसपासच्या स्त्रियांना लिहिता वाचता यावं म्हणून त्या त्यांचे खास वर्गही घेत. स्त्रियांनी घराबाहेर पडून काही करावं म्हटलं तर सर्वसाधारणपणे घरांतल्यांकडून विरोध होतो,
पण तोच विरोध त्या धार्मिक कार्यासाठी बाहेर पडत असतील तर तितकासा तीव्र राहत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रखमाबाईंनी प्रथमतः स्त्रियांना धार्मिक पुस्तक वाचनासाठी एकत्र केलं व नंतर त्यातून
‘वनिता आश्रम’ची स्थापना केली. इतर उपक्रमा सोबत विधवाआश्रम आणि अनाथाश्रम हे वनिताआश्रमचं मुख्य कार्य होतं.

एकीकडे दिवसाचे अठरा तास काम,
दर शनिवारी
‘आयरिश मिशन’च्या दवाखान्यात मोफत सेवा तर दुसरीकडे समाजिक कार्य,
हे शिवधनुष्य त्यांनी सहज पेललं होतं.
(रोजच्या कामांच्या भाऊगर्दीत अगदी साडी नेसण्यात वेळ जाऊ नये म्हणून त्या पेटिकोटला साडीच्या निर्याय शिवून ठेवत).

सुरतेला असताना रमाबाई रानडेंनी अध्यक्षपद भूषवलेल्या १९०७ च्या सुरतेच्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या स्वागत समितीच्या चिटणीसपदी त्यांनी काम केलं,
तर पुढे राजकोटला गेल्यावर ‘रेडक्रॉस सोसायटी’ ची शाखा उघडली.
पहिल्या महायुद्धा दरम्यानचं त्यांचं कार्य लक्षात घेऊन १९१८ साली त्यांना रेडक्रॉस तर्फे सन्मानपदक देण्यात आलं.

स्त्रियांसाठी त्यांनी खास विज्ञान-स्त्रीशिक्षकांच्या व्याख्यानमाला चालवल्या आणि अगदी किती स्त्रिया तिथे हजर होत्या,
इथपासूनची नोंद ठेवली.
इतकंच नव्हे,
तर कामाठीपुरा मधल्या स्त्रियांसाठी आरोग्य विषयक व्याख्यानं घडवून आणली. स्वतःच्या आजोबांच्या मालकीचं गावदेवीचं मंदिर सर्वांसाठी खुलं केलं.
अस्पृश्यांना, त्यांच्या स्त्रियांना हक्क आहेत ही त्यांची धारणा होती.
‘असमर्थांना आपण समर्थ बनवण्याचा प्रयत्न केला,
परंतु जे दुर्लक्षित आहेत त्यांच्या प्रश्नांचं काय’ ही भावना त्यांना छळत असे.
त्यातूनच त्यांनी प्रत्येक ज्ञातिचे काय हक्क आहेत त्यांच्या याद्या लिहून काढल्या.
उदा. महाराला बावन्न हक्क आहेत,
तर त्यांना त्या हक्कांची जाणीव करून दिली.
अगदी ऐंशीच्या घरात वय असतानादेखील कुणा एकाकी मुलीला आसरा देणं,
तिला लिहायला वाचायला शिकवणं,
‘मिडवाईफरी’ ची परीक्षा द्यायला लावणं अशी कामं त्या करत राहिल्या.
स्त्रियांना बँका मध्ये खातं काढायला लावून बचतीचं महत्त्व कृतीतून तेव्हाही शिकवत राहिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!