मिलिट्रीत भरती झालेला मुलगा घरी परतलाच नाही, शोध घेण्यासाठी आईबापाने दोन एकर शेती विकली, आता आमरण उपोषणाला बसले
औरंगाबाद:- देश सेवेसाठी सैन्यात गेलेला मुलगा पुन्हा घरी न परतल्याने संभाजीनगरमध्ये वृ्द्ध आईवडिलांनी आमरण उपोषण पुकारले आहे. या मुलाला शोधण्यासाठी शेतकरी आई-वडिलांनी अवघा देश पालथा घातला. मात्र, मुलगा सापडत नसल्यामुळे व्यतीत झालेल्या सैनिकाच्या आई-वडिलांनी छत्रपती संभाजी नगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात मुलाचा शोध लागावा या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात असलेल्या माळेगाव पिंपरी येथील रवींद्र भागवत पाटील हा २००५ साली भारतीय सैन्यांमध्ये भरती झाला. स्वतःचा मुलगा सैन्यात भरती होऊन देशसेवा करीत असल्याच्या आनंदात रवींद्र याचे वडील भागवत व बेबाबाई यांचा आनंद गगनात मावत नव्हता २००५ ते २०१० पर्यंत रवींद्र हा सैन्यात भरती करून आई-वडिलांच्या संपर्कात होता. मात्र, २०१० सालापासून रवींद्र हा अचानक बेपत्ता झाला त्याचा आई-वडिलांशी संपर्क झाला नाही, असे त्याचे वडील भागवत पाटील सांगतात. याप्रकरणी भागवत यांनी सैन्य कार्यालयामध्ये अनेक वेळा संपर्क साधला. मात्र, त्या कार्यालयातून पुरेसा प्रतिसाद मिळणार नसल्यामुळे त्यांना तिकडून मुलाबद्दल काहीच उत्तर मिळाले नाही.
रवींद्रचे वडील भागवत पाटील यांनी सांगितले की, आमच्या मुलाचा पत्ता लागत नसल्यामुळे आम्ही त्याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये माहिती घेतली. आम्ही त्या ठिकाणी जाऊनही बघितले. आमची आर्थिक परिस्थिती आणि वयाने आम्हाला फिरणं शक्य होत नाही. तरीदेखील मुलाच्या शोधासाठी आम्ही प्रयत्न करत राहिलो. मात्र, अद्यापपर्यंत आमच्या मुलाचा पत्ता लागला नाही. या संपूर्ण शोध मोहिमेमध्ये त्यांनी दोन एकर शेती गमवावी लागली आहे. यामुळे दुसऱ्या मुलाची पत्नी आणि मुलगाही सांभाळ करत नाही. आमची देखील शेती तुम्ही अशीच गमावून टाकाल, असे ते म्हणतात. आम्ही आता सर्व ठिकाणी फिरून बघितले. मात्र आम्हाला आमच्या मुलाविषयी कोणाकडूनही उत्तर मिळाले नाही. यामुळे आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करून शेवटची दाद मागत आहोत, अशी भावनिक मागणी प्रशासनाकडे हरवलेल्या भारतीय सैनिक रवींद्र पाटील यांचे वडील भागवत पाटील यांनी केली आहे.